पुद्दुचेरीमधील काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. अनेक दिवसांपासून सरकार अस्थिरतेच्या चर्चा सुरू होत्या. पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणित सत्तारुढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर व्ही. नारायणसामी यांचं सरकार संकटात आलं होतं. यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागलं. यावेळी सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये राजकीय वेश्याव्यवसाय सुरू असल्याची टीका व्ही. नारायणसामी यांनी केली आहे.
पुद्दुचेरीच्या विधानसभेत ३३ सदस्य आहेत. काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एका आमदाराच्या राजीनाम्यानं सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर ७ जागा रिक्त आहेत. यामुळे नारायण सामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्यानं काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.
पुद्दुचेरीतील नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. बहुमताचा प्रस्ताव मांडताच काही वेळातच सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्त केला आहे.
Comments
Loading…