लोकशाही न्यूज नेटवर्क
पँगाँग सरोवर परिसरातून चीन आणि भारताच्या सैन्याने एकाचवेळी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कमांडर पातळीवरील चर्चेतील नवव्या फेरीत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे.
गेल्या मे महिन्यापासून येथे चाललेल्या तणावामुळे भारताला प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला होता. मात्र अखेर भारताच्या रणनीतीला यश येत चीन माघार घेण्यास तयार झाला आहे. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत चीनवर तोफ डागली. भारतीय भूमीवर कब्जा करून बसलेल्या चीनला अद्दल घडवण्यासाठी भारताने त्रिसूत्रीचा वापर केला आणि त्याचे परिणाम म्हणून आता चीनला माघारी फिरावे लागले.
चिनी ड्रॅगनचा सामना करण्यासाठी भारताने अनेक मार्गांचा अवलंब केला. एप्रिल महिन्यात पूर्व लडाख परिसरात ड्रॅगनने आग ओकायला सुरूवात केली, तेव्हाच पुढची पावले ओळखून भारताने तिथे अतिरिक्त कुमक पाठवण्यास सुरूवात केली. चीनचा सामना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 हजार सैनिक तैनात करण्यात आले होते. नंतर जसजसे चीनने आपले सैन्य वाढवले, तसे प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतानेही सीमेवर आपल्या जवानांची भक्कम तटबंदी उभी केली. मे महिन्यात टाइप 15 लाइट टँक्स, इन्फन्ट्री फायटिंग व्हेईकल्स, हॉवित्सर गन्स आणि मिलाइल्स तैनात करण्यात आल्या होत्या. भारताचा हा वाढता आक्रमकपणा पाहून चीन काहीसा थबकल्याचे चित्र होते.
एकीकडे सीमेवर लष्कर आक्रमक होत असताना दुसरीकडे भारताने राजकीय पातळीवरही व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली होती. परिस्थिती पाहून लष्कराला सीमेवर निर्णय घेण्याची पूर्ण सूट देण्यात आली होती. चीनचे राजकीय खच्चीकरण आणि भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखचा दौरा केला. शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली. देशातून अनेक चिनी कंपन्यांचं कंत्राट रद्द करण्यात आले. चिनी गुंतवणुकीवरूनही भारताने राळ उठवल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याचे पडसाद उमटले आणि चीनवर दबाव निर्माण करण्यात भारत यशस्वी झाला.
सीमावाद सोडवण्यासाठी भारत आणि चिनी लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या अधिकाऱ्यांमध्ये सातत्याने बैठका होत होत्या. मात्र, चर्चेनंतरही चीन माघार घेण्यास तयार नव्हता. त्यामुळे भारताने शक्कल लढवली. चर्चा सुरू असताना भारतीय लष्करानं पूर्व लडाखच्या अनेक टेकड्यांवर कब्जा करण्यास सुरूवात केली. भारतीय सेनेने मागर हिल, गुरूंग हिल, रेजांकला, राचाना ला आणि फिंगर फोरच्या अनेक टेकड्या ताब्यात घेतला. ज्यामुळे चीनला मागे हटण्याशिवाय पर्याय नव्हता.
Comments
Loading…