कोरोनाने पुन्हा थैमान घातले असून गेल्या पाच दिवसांत ३२ बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर शहरात लॉकडाऊन आणखी सात दिवसांसाठी वाढवण्यााचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, अंजनगाव सुर्जी हे शहरच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून तिथेही प्रतिबंधात्मक आदेश कायम असणार आहे.
अमरावती जिल्ह्यात २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. हा लॉकडाऊन सोमवारी संपणार असून अमरावती शहर आणि अचलपूर शहरात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा व वस्तूच उपलब्ध असतील. बाकी सर्व व्यवहार पूर्णत: बंद राहतील. त्यात शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कोणत्याही कार्यक्रमास परवानगी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत करोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शुक्रवारी ९६७ नवीन रुग्णांची भर पडली तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. अमरावतीमध्ये गेल्या पाच दिवसांत ४ हजार ६१ नवीन करोना बाधितांची भर पडली असून ३२ रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून आता ६ हजार ७४० इतकी झाली आहे.
नागपूर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर
नागपूर शहरासह जिल्ह्यातील परिस्थितीही गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा ९ हजार १४१ इतका झाला आहे. नागपूर पालिका हद्दीत शुक्रवारी ८८१ नवीन रुग्णांची भर पडली तर जिल्ह्याच्या अन्य भागात आणखी २९३ रुग्ण आढळले. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. आज व उद्या नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले असून महापौर दयाशंकर तिवारी यांनीही अनेक भागांमध्ये फिरून नागरिकांना खबरदारी बाळवण्याचे व नियम पाळण्याचे आवाहन केले. शहरातील रुग्णवाढ कायम राहिल्यास लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यताही बळावू लागली आहे.
Comments
Loading…