मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या एका बैठकीत राज्यभरातील कोरोनासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. त्यानुसार कोरोनाचा संसर्ग थोपविण्यासाठी राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश आज राज्य शासनाने जारी केले असून मिशन बिगीन अगेनचे हे आदेश 15 एप्रिलपर्यंत लागू राहतील.
असे आहेत नियम –
- 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई (जमावबंदी)
- आज मध्यरात्रीनंतर म्हणजे उद्या रविवारपासून याची अंमलबजावणी, या नियमाचा भंग केल्यास प्रती व्यक्ती 1 हजार रुपये दंड
- सागरी किनारे व उद्याने, बागा ही सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद, भंग केल्यास प्रती व्यक्ती 1 हजार रुपये दंड
- मास्क न घालणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस 1000 रुपये दंड होईल
- सर्व एक पडदा व मल्टिप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद. मात्र या वेळेत ‘टेक होम डिलिव्हरी’ सुरू राहील
- या नियमाचा भंग झाल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविडचा प्रादुर्भाव असेपर्यंत बंद करण्यात येईल. शिवाय, सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल
- कुठलेही सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम, मेळावे यांना परवानगी नाही
- विवाह समारंभासाठी 50पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई
- अंत्यसंस्कारासाठी 20पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत
- खासगी आस्थापनांमध्ये (आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) 50 टक्क्यापर्यंत कर्मचारी उपस्थिती
- शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील.
- उत्पादन क्षेत्र मात्र पूर्ण क्षमतेने काम सुरू ठेवू शकते.
- शासकीय कार्यालयांतील गर्दी कमी करण्यासाठी अभ्यागत नागरिकांना अगदी आवश्यक आणि तत्काळ कामांसाठीच प्रवेशाची परवानगी
- सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाने दर तासाला कमाल किती भाविक असावेत ते निश्चित करावे.
- त्या ठिकाणी वावरण्यास पुरेशी जागा व आरोग्याचे नियम पाळले जात आहेत किंवा नाहीत ते सुनिश्चित करावे. ऑनलाइन आरक्षणावर भर द्यावा.
Comments
Loading…