लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरात पंतप्रधानांच्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावर जोरदार प्रहार केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वापरलेल्या ‘आंदोलनजीवी’ या शब्दावरून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली असून आणीबाणीपासून अयोध्या अंदोलन, महागाईपासून ते काश्मिरातील ३७० कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली, असे म्हणत रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. त्या भाजपचे पंतप्रधान मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाची आतापर्यंत झालेली सर्व आंदोलने मग राजकीय हितासाठी आणि सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल, असे नमूद करत काश्मिरातून ३७० कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले आणि बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता आंदोलनजीवी ठरवले गेले. कांतिकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो, असे सांगतानाच आपल्या देशात हेच सुरू आहे का?, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.
‘आंदोलनांमुळेच मोदी, शहा दिल्लीच्या तख्तावर पोहोचले’
राऊत पुढे म्हणतात की, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे आज आंदोलनांची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्स्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच गोध्राकांड आंदोलनाने मोदी आणि शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले.
Comments
Loading…