लोकशाही न्यूज नेटवर्क
वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, तो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. याच मुहूर्तावर साक्षात श्री पांडुरंग आणि माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो.
या शाही विवाह सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आल आहे.
5 टन फुलांचा वापर करण्यात आलाय. यामध्ये झेंडू, जलबेरा, गुलछडी, एनथोरियम या फुलांसह 25 प्रकारची फुलं वापरली आहेत. देवाच्या गाभाऱ्याला देवांच्या दरबाराप्रमाणे सजावट करण्यात आलीय. यामध्ये पांढऱ्या शुभ्र सिल्कच्या वस्त्रांमध्ये माता रुक्मिणी आणि भगवान विठ्ठल अधिक खुलले आहेत. भारतीय संस्कृतीत शुभ चिन्ह मानले जाणारे ओम, स्वस्तिक गाभाऱ्याच्या प्रवेश द्वारावर तयार करण्यात आला आहे.
तर सभामंडपात फुलांचे व्यासपीठ तयार करण्यात आलाय. या विवाहसोहळ्यासाठी साक्षात ब्रह्मदेव सरस्वती, शंकर पार्वती, विष्णू महालक्ष्मी, बालाजी पद्मावती, राधा कृष्ण या जोड्यांसह गणपती, नारदमुनी यासारखे स्वर्गातील देवही उपस्थित राहिले आहेत. नामदेव पायरीवर नवरा नवरीच्या प्रतिमा फुलांतून सजवण्यात आल्या आहेत. पुण्याचे भक्त भारत भुजबळ यांनी ही सेवा दिलीय. एकंदरीतच वसंत पंचमी हा निसर्गाचा उत्सव जणू निसर्गाच्या सानिध्यात साजरा होतोय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. लग्नघटिका जवळ येऊ लागल्याने भक्तांची उत्सुकता वाढली आहे. मात्र कोरोनाच्या सावटाखाली विवाह सोहळा होत असल्याने तो घरीच बसून लोकशाहीच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
Comments
Loading…